राहूरीत रासपकडून तहसीलदारांना निवेदन: ‘सातबारा कोरा’ कधी करणार ? रासप आक्रमक: 

राहूरी वेब प्रतिनिधी ,१८ (शरद पाचारणे ):- विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या आणि संपूर्ण वीज बिल माफ करण्याच्या महायुती सरकारच्या आश्वासनांची पूर्तता कधी होणार, असा सवाल राष्ट्रीय समाज पक्षाने उपस्थित केला आहे. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार, राज्यभरात तहसीलदारांना निवेदने देण्यात येत असून, याच क्रमात राहूरीच्या तहसीलदार नामदेव पाटील यांनाही निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सरकारने शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी ही आश्वासने दिली होती, परंतु आता त्याचा विसर पडल्याचे दिसत आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाचे पालन कधी करणार याचा जाब द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाने केली आहे. जोपर्यंत ही आश्वासने पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांनी कोणत्याही कार्यक्रमात शासनाच्या प्रतिनिधींना जाब विचारावा, असे आवाहनही पक्षाने केले आहे.

या मागण्या पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राहूरी येथे निवेदन देताना राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख नानासाहेब जुंधारे, तालुकाप्रमुख शिवाजी खेडेकर, उपप्रमुख जबाजी बाचकर, अल्पसंख्याक अध्यक्ष बिलाल शेख, गटप्रमुख कमालभाई शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देऊन शासनाने या गंभीर बाबीची दखल घ्यावी अशी विनंती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *