माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा ४० शेतकऱ्यांसह एसटी प्रवास; AI तंत्रज्ञान कार्यशाळेत सहभाग

राहुरी वेब प्रतिनिधी,२२ (शरद पाचारणे )- अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे आज बारामती आणि श्रीरामपूर येथील संस्थांच्या वतीने ए आय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान आणि ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत प्रमुख संस्थांच्या मान्यवरांनी आणि एआय तंत्रज्ञान तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर या खाजगी कारखान्याच्या शेतकऱ्यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहण्याची मागणी व्यवस्थापनाकडे केली होती. व्यवस्थापनाने तात्काळ ही मागणी मान्य करत शेतकऱ्यांच्या सहभागाची सोय केली.

विशेष म्हणजे, या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी राज्य परिवहन मंडळाची (एसटी) बस उपलब्ध करून 40 शेतकऱ्यांसह राहुरी ते श्रीरामपूर असा प्रवास केला. तनपुरे यांच्यासोबत शेतकऱ्यांनी एसटीने प्रवास करत कार्यशाळेत सहभाग नोंदवला.

यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी फेसबुक लाईव्ह करत एआय तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांसाठी पुढील काळात आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती व महत्त्व विशद केले. केंद्र सरकारने यंदाचे वर्ष एआय तंत्रज्ञानाचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून श्रीरामपूर येथील ही कार्यशाळा महत्त्वाची ठरली. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेतकऱ्यांसह एसटीने केलेला हा प्रवास अहमदनगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *