गडदे आखाड्याच्या तरुणावर जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल


राहुरी वेब प्रतिनिधी ( शरद पाचारणे ) :-
 ‘तू जास्त माजलास का’ असे म्हणत लोखंडी रॉड, कोयता, लोखंडी गज आणि फायटरने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गडदे आखाडा येथे घडली आहे. या प्रकरणी सुरेश अशोक आढाव (रा. गडदे आखाडा) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, २१ जून २०२५ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरेश आढाव हे त्यांच्या मित्राला सोडून घरी परत येत होते. चिंपाचीवाडी, चिंचाळी येथे आल्यानंतर त्यांना ओळखीचे असलेले शिवा भाऊसाहेब कोळसे, दत्तू बाळासाहेब कोळसे, सागर चांगु कोळसे आणि नवनाथ चांगदेव कोळसे (सर्व रा. गडदे आखाडा) यांनी अडवले.या चौघांनी “तू जास्त माजला काय” असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आढाव यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, शिवा भाऊसाहेब कोळसे याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने आढाव यांच्या हातावर आणि पायावर मारहाण केली. त्याचवेळी दत्तू बाळासाहेब कोळसे याने त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर कोयत्याने वार केला. सागर चांगु कोळसे याने लोखंडी गजाने पाठीवर मारले, तर नवनाथ चांगदेव कोळसे याने त्याच्या हातातील लोखंडी फायटरने मारहाण केली.मारहाण करत शिवीगाळ करत ‘जीवे ठार मारण्याची’ धमकीही दिली. सुरेश आढाव यांनी आरडाओरडा केल्याने मारहाण करणारे तिथून पळून गेले. आढाव यांच्या नातेवाईकांनी त्यांना तात्काळ  जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या जबाबानुसार, शिवा भाऊसाहेब कोळसे, दत्तू बाळासाहेब कोळसे, सागर चांगु कोळसे आणि नवनाथ चांगदेव कोळसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *