राहुरी वेब प्रतिनिधी,२४ (शरद पाचारणे )-
डोळे ही ईश्वराने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. आपल्या देशात काही व्यक्ती या जन्मजात अंध असतात तर काही अपघाताने आपली दृष्टी गमावतात. या सर्व अंध व्यक्तींच्या जीवनात जर खरोखर प्रकाशमय आनंद आणायचा असेल तर आपण या मरणोत्तर दृष्टिदानाच्या संकल्पने आणू शकतो. आपण या जगातून गेल्यानंतर सुद्धा जिवंत राहायचे असेल तर मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला पाहिजे. त्यामुळे अंधांची वाटचाल सुखकर होईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय व शिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नानासाहेब पवार सभागृहात नेत्रदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. शरद गडाख बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साई सूर्य नेत्रसेवेच्या संचालिका डॉ. सुधा कांकरिया या प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, कृषी तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सुनील भनगे व क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या की जगामध्ये सर्वात जास्त अंध व्यक्ती भारतात आहेत. या अंध व्यक्तींच्या जीवनात आनंदाचा किरण पसरविण्याचा संकल्प या नेत्रदान जनजागृती अभियानाच्या माध्यमातून करूया. नेत्रदान हे खूप मोठे पुण्याचे काम आहे. यावेळी त्यांनी डोळ्यांची रचना, कार्य, डोळ्यांचे आजार, घ्यावयाची काळजी व नेत्रदानाविषयीचे अज्ञान व अंधश्रद्धा यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी नेत्रदान जनजागृती अभियान यशस्वीपणे राबविल्याबद्दल कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला तसेच त्यांनी लिहिलेली पुस्तके विद्यापीठाला भेट म्हणून दिली. यावेळी डॉ. सुधा कांकरिया यांनी उपस्थित सर्वांना नेत्रदानाविषयी शपथ दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. साताप्पा खरबडे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. विलास आवारी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, पदव्युत्तर महाविद्यालय, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.