राहुरी, २७ जुलै (वेब प्रतिनिधी, शरद पाचारणे): स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नाफेडमार्फत कांद्याला 2000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, अशी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आज (रविवार, २७ जुलै २०२५) राहुरी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे राहुरी येथील बाजार समितीमधील एका कार्यक्रमासाठी आले असता, त्यांना हे निवेदन सादर करण्यात आले. शासनाने तातडीने शेतकऱ्यांचा कांदा नाफेड मार्फत 2000 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करावा, कांदा निर्यातीवर प्रत्येक क्विंटल हजार रुपये अनुदान द्यावे, याचबरोबर नाफेड चे कांदा खरेदीचे केंद्र वाढवावेत अशी मागणी केली तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह प्रकाश देठे, बाळासाहेब जाधव, आनंद वने, सचिन म्हसे, रविकीरन ढुस, धनंजय लहारे, किशोर वराळे, सतीश पवार, प्रमोद पवार, निलेश लांबे, सुनील आगळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.