प्रहारचा एल्गार! राहुरीत नगर-मनमाड महामार्गावर शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

राहुरी वेब प्रतिनिधी,२४ (शरद पाचारणे ):

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला प्रतिसाद देत, राहुरी शहरातही गुरुवारी, २४ जुलै रोजी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. प्रहार दिव्यांग संघटना आणि प्रहार क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड महामार्गावर मार्केट कमिटीसमोर सकाळी ९ वाजता रास्ता रोको करत आपल्या विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यात प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांसाठी केलेल्या विविध आंदोलनांचा उल्लेख करण्यात आला आहे. सरकारने फक्त आश्वासने दिली असून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या अशा आहेत:

१)शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी: शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करण्यात यावा.
२)रोजगार हमी योजनेअंतर्गत खर्च: पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (MREGS) मिळावा.
३)हमीभाव: शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा.
४)दिव्यांगांसाठी पेन्शन: दिव्यांगांना दरमहा ६,००० रुपये पेन्शन मिळावी.
५)दिव्यांगांसाठी घरकुल: दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर गाडगे, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, राहुरी तालुका अध्यक्ष योगेश लबडे, जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेश लांबे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे आणि प्रकाश देठे यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला.यावेळी प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तिथ होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *