राहुरी वेब प्रतिनिधी,०५ (शरद पाचारणे ):- राहुरी आणि राहाता तालुक्यांमध्ये मुळा आणि प्रवरा नदीकाठावर बेकायदेशीर वाळू उपसा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी फिरत असून, पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या गंभीर प्रकारावर तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट पत्र पाठवले आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने वाळूमाफियांना बळ
पवार यांच्या आरोपानुसार, राहुरी तालुक्यातील मुळा नदीकाठच्या गावांमध्ये तसेच राहाता तालुक्यातील सोनगाव, सात्रळ, हनुमंतगाव, धानोरे, कोल्हार, चिंचोली या गावांमध्ये तलाठी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने वाळू माफियांनी बेकायदेशीर वाळू उपसा अत्यंत वेगाने सुरू केला आहे. स्थानिक प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे किंवा अप्रत्यक्ष पाठिंब्यामुळे वाळू माफियांना मोकळे रान मिळाले आहे.
पर्यावरणाची मोठी हानी आणि भविष्यातील धोके
या बेकायदेशीर वाळू उपशामुळे नदीपात्रांमध्ये मोठे आणि खोल खड्डे तयार झाले आहेत. यामुळे निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. पवार यांनी निदर्शनास आणले आहे की, भविष्यातील पावसाळ्यात या खोल खड्ड्यांमुळे नदीकाठची गावे, शेती, पूल आणि रस्ते यांना भीषण धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः राहुरी रेल्वे स्टेशनजवळील ब्रिटिशकालीन लोखंडी पुलाखाली आणि पश्चिम बाजूच्या शेतजमिनीतून ट्रॅक्टरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक खुलेआम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या सहमतीने खाजगी रस्ते तयार करून ही वाहतूक केली जात असल्याचेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
तातडीने कारवाईची मागणी
या सर्व प्रकाराला स्थानिक अधिकाऱ्यांचा ‘अर्थपूर्ण’ आशीर्वाद कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप दादासाहेब पवार यांनी केला आहे. त्यांनी शासनाकडे तात्काळ तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून नदीपात्रातील खड्ड्यांचे मोजमाप करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकाराला जबाबदार असलेल्या दोषी तलाठी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून दंड वसूल करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. बेकायदेशीर वाळू उपसा तात्काळ थांबवून या प्रकारात गुंतलेल्या सर्व व्यक्तींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पवार यांनी या पत्राची प्रत जिल्हाधिकारी, तहसीलदार, तसेच पोलीस प्रशासनालाही दिली आहे. या गंभीर प्रश्नावर आता शासन काय पावले उचलते, याकडे राहुरी आणि राहाता तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.